बीड -भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या बीड व इतर जिल्ह्यातील बोगस शालार्थ आयडी, शिक्षक व कर्मचारी भरती बाबत प्राप्त तक्रारीवरून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते किरण देशपांडे यांच्या तक्रारी वरून शिक्षण उपसंचालक यांनी ही समिती नियुक्त केली आहे. त्यामुळे आता या संस्थेत बोगस भरती करणारे अध्यक्ष, कार्यवाह, सहकार्यवाह यांचे धाबे दणाणले आहेत.
अंबाजोगाई येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेमध्ये गेल्या 2012 ते 2025 या काळात मोठ्या प्रमाणात बोगस शिक्षक आणि कर्मचारी भरती करण्यात आली. राज्यात शालार्थ आयडी प्रकरणी सरकारने एस आय टी स्थापन केल्यानंतर बीड जिल्ह्यात झालेल्या बोगस भरती बाबत देखील समितीकडे तक्रारी करण्यात आल्या.
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते किरण देशपांडे हे याबाबत मागील वर्षभरापासून पाठपुरावा करत आहेत. भाशिप्र या संस्थेच्या अध्यक्ष, कार्यवाह आणि सहकार्यवाह यांनी जवळपास दोनशे पेक्षा अधिक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची या दरम्यान भरती केली.
एवढ्यावरच नं थांबता या लोकांनी जिल्ह्यातील इतर संस्थामध्ये देखील आपले नातेवाईक नोकरीस लावले. या सर्व प्रकरणाची वाच्यता होऊ लागल्यानंतर संस्थेच्या लोकांनी साम दाम दंड भेद नीती वापरून प्रकरण मॅनेज करण्याचा प्रयत्न केला.
मात्र शिक्षण विभागाचे छत्रपती संभाजीनगर चे उपसंचालक कैलास दातखिळ यांनी भाशिप्र मधील नोकर भरती, बोगस शालार्थ आयडी आणि इतर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय समिती गठीत केली आहे. या समितीमध्ये उपशिक्षणाधिकारी मारोती जाधव आणि वेतन पथक प्राथमिक चे अधीक्षक राजेंद्र ढाकणे यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.
भाशिप्र मध्ये झालेल्या घोटाळ्या प्रकरणी जी समिती नियुक्त केली आहे, त्यांनी प्रामाणिकपने चौकशी करावी अन्यथा समिती मॅनेज करण्यात हातखंडा असलेल्या लोकांच्या दबावात हे अधिकारी आल्यास अहवाल मॅनेज होण्याची भीती व्यक्त केली जातं आहे.




Leave a Reply Cancel reply