बीड -दहावीच्या परीक्षाना आजपासून सुरुवात झाली. बीड तालुक्यातील कुर्ला या गावी चक्क मंडप टाकून दहावीच्या परीक्षा घेण्यात येतं असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कुर्ला गावातील यशवंत विदयालयात जागेअभावी मंडप टाकून विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
एकीकडे शिक्षण विभागाने कॉपी मुक्त अभियान सुरु केले आहे. यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर सिसिटीव्ही बसवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र बीड जिल्ह्यात अनेक परीक्षा केंद्रावर शासनाने घालून दिलेले नियम पायदळी तुडवले जात असल्याचे चित्र समोर आले आहे.
बारावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी चा प्रकार चौसाळा या ठिकाणी उघडकीस आला. त्यानंतर या परीक्षा केंद्रावर असलेल्या 16 शिक्षक आणि कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले.
हा प्रकार ताजा असतानाच शुक्रवार पासून सुरुवात झालेल्या दहावीच्या परीक्षेत आणखीनच मोठा गैरप्रकार समोर आला आहे.
बीड तालुक्यातील कुर्ला या गावात असलेल्या यशवंत विद्यालय या परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने आणि शाळेला चारच खोल्या असल्याने शाळेसमोर चक्क मंडप टाकण्यात आला आहे. मंडप टाकून डेस्क मांडून विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागली आहे.

गावात जणूकही एखादे लग्न असल्याप्रमाणे मंडप टाकून शाळेने परीक्षा घेण्याचा घेतलेला निर्णय सगळ्यांनाच आश्चर्यकारक वाटणारा आहे. याबाबत शिक्षण विभाग आणि जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












Leave a Reply