News & View

ताज्या घडामोडी

नियमाच्या चौकटीतच कामे करा -पंकजा मुंडे!

जालना-विकासाची कामे करतांना कोणाच्याही दबावाला बळी न पडता प्रशासनाने कायद्यानुसार व नियमानुसार काम करावे. जिल्ह्याची पालकमंत्री म्हणुन मी कायदे व नियमाच्या चौकटीतच सामान्य जनतेसाठी काम करणार आहे. सर्व सामान्य लोकांवर अन्याय होणार नाही याची खबरदारी घ्यावी. जिल्ह्यातील विविध विभाग आणि क्षेत्रातील समस्या असतील त्या मी सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे असं पालकमंत्री तथा राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज अधिकाऱ्यांच्या बैठकीत स्पष्टपणे सांगितलं.

शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात ना. पंकजाताई मुंडे यांनी विविध विभागाचा आढावा घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या की, जालना जिल्ह्याची पालकमंत्री म्हणुन, जिल्ह्याच्या सर्वांगींण विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे. जिल्ह्यातील विकासाची कामे करण्यासाठी लवकरच नियोजन समिती तयार होईल. विकासाचे काम करतांना कोणाच्याही दबावाला बळी न पडता प्रशासनाने कायद्यानुसार व नियमानुसार काम करावे. जिल्ह्याची पालकमंत्री म्हणुन मी कायदे व नियमाच्या चौकटीत सामान्य जनतेसाठी काम करणार आहे. जिल्ह्यातील विविध विभाग आणि क्षेत्रातील समस्या असतील त्या मी सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे.

पर्यावरण विभागाने आराखडा तयार करावा

जिल्ह्यातील पर्यावरण व वातावरणीय बदलाबाबत राबविण्यात येणाऱ्या योजना, भविष्यातील ध्येय धोरणे, घनकचरा व्यवस्थापन, पाणी, हवा प्रदूषण, नदी व तलाव संवर्धन, पर्यावरण जतनकरीताचे सुनियोजित पर्यांवरण विभागाने आराखडा तयार करावा.


जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यातील पशुधन, राज्य व केंद्र पुरस्कृत योजना, एकात्मिक सर्वेक्षण योजना पशुगणना, जिल्हा वार्षिक योजना, विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ यासह राज्यातील पशुसंवर्धन विभागातील योजनांना गती देण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यात गोट फार्मींग आणि एक जिल्हा एक उत्पादन कार्यक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करावे.


जालना जिल्ह्याची औद्योगिक जिल्हा म्हणुन ओळख आहे. यामुळे याठिकाणी पर्यावरणांच्या दृष्टीने नियोजन करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. पशुसंवर्धन विभागातील योजनांना गती देवून, पर्यावरण विभागातील कामांमध्ये लोकसहभाग घेत पर्यावरणपूरक वातावरणासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचेही श्रीमती. मुंडे यांनी यावेळी सांगितले.


यावेळी पालकमंत्री श्रीमती मुंडे यांनी जिल्हा नियोजन, जिल्ह्यातील प्रकल्प, क्रिडा संकुल, रेशीम, मॅजीक इन्क्युबेशन, प्रादेशिक मनोरुग्णालय, ड्रायपोर्ट आदींचा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडून आढावा घेतला. तसेच पर्यावरण विभाग, पशुसंवर्धन विभाग यांचा आढावा घेत. जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील उद्योजकांची भेट घेवून त्यांच्या समस्यांची जाणुन घेतल्या.


बैठकीच्या प्रांरभी जिल्हा प्रशासन, सर्व उपजिल्हाधिकारी, मनपा प्रशासन, महसुल संघटना, सरपंच संघटना आदीनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल, अप्पर जिल्हाधिकारी रिता मैत्रवार, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांच्यासह संबंधीत विभागाचे अधिकारी यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *