बीड –बीड नजीक असलेल्या उखंडा तलावाजवळ ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन तरुण मित्रांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. हे तिघे तरुण नवगण राजुरी येथील रहिवाशी असून या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.
कैलास टुले, ऋषिकेश फुलझळके आणि अक्षय शिंदे अशी मृतांची नावे आहेत. अहिल्यानगर बीड महामार्गाचे काम सध्या सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे तसेच अर्धवट पूल आहेत.
उकंडा तळ्याजवळ पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी त्यांच्या दुचाकीला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की तिघांचाही जागीच मृत्यू झाला.दरम्यान, पुलाच्या कामाच्या ठिकाणी वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक दिशादर्शक फलक, रेडियम पट्टे अथवा इतर सुरक्षाव्यवस्था नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. बीड-नवगण राजुरी मार्गाचे राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. बांधकामाच्या ठिकाणी योग्य सुरक्षा व्यवस्था करणे अपेक्षित असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने हा अपघात घडल्याचा आरोप होत आहे.




Leave a Reply Cancel reply