बीड -बीड तालुक्यातील लिंबागणेश, पिंपरनई यासंह अनेक भागात गुरुवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे कलिंगड, अंबा, गहू पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह तहसीलदार चंद्रकांत शेळके व संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून शासनास सादर करावेत अशा सूचना यावेळी आ क्षीरसागर यांनी दिल्या.
बीड तालुक्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपि्टीमुळे फळबाग आणि शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडांशी आलेले टरबूज, खरबूज, अंबा, गहू या पिकांना मोठा फटका बसला आहे.
याबाबत माहिती मिळताच बीडचे आ संदीप क्षीरसागर यांच्यासह राजेंद्र मस्के (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), तहसीलदार चंद्रकांत शेळके, मंडळ अधिकारी पंडीत नाईकवाडे, तलाठी प्रमोद कोळपकर, तलाठी गणपत पोतदार, कृषी सहायक रामेश्वर पेजगुडे, महसूल सेवक ललित काकडे तसेच सरपंच बिभिषण मुळीक यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.
दरम्यान, शेतकरी दादासाहेब खिल्लारे यांनी सांगितले की, दीड एकर क्षेत्रावर सुमारे दीड लाख रुपये खर्च करून कलिंगड लागवड करण्यात आली होती. गेल्या वर्षी याच पिकातून सुमारे साडेचार लाखांचे उत्पन्न मिळाले होते. मात्र यावर्षी ऐन बहरात आलेले पीक गारपिटीमुळे पूर्णपणे वाया गेले आहे.
या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाने वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.





Leave a Reply