News & View

ताज्या घडामोडी

देवभाऊ तुमचं चुकलंच !

विशेष संपादकीय / लक्ष्मीकांत रुईकर

देवा भाऊ तुमचं खरंच चुकलं, तुम्ही जेव्हा शाळेत होता तेव्हा म्हणजेच 70 च्या दशकात शरद पवारांनी राजकारणातलं पहिलं बंड केलं आणि पाठीत खंजीर खुपसणे हा वाक्प्रचार ऑक्सफर्ड डिक्शनरीत लिहिला गेला. आता पवारांचं बंड आणि त्यांनी वेळोवेळी स्वपक्षीयांना ब्लॅकमेल करत आपलं मांडलेलं दुकान आणि आपल्याच पक्षासोबत वेळोवेळी केलेला धोका सर्वसामान्य वाडी वस्ती तांड्यावरील माणसाला तोंड पाठ झाला आहे किंवा त्यांनी एखाद्याच्या खांद्यावर हात ठेवला की त्याचा करेक्ट कार्यक्रम झाला असं म्हटलं जातं हे सगळं माहीत असून देखील तुमच्यासारख्या 30 40 वर्ष राजकारणात मुरलेल्या माणसांना त्यांच्यावर अंध पण विश्वास ठेवावा आणि त्यांनी तुमचा गळा कापावा त्यात आश्चर्य वाटण्यासारखे दुसरं काही नाहीये. त्यांनी जो धोका दिला त्यातून तुमची सत्ता लालसा उघड करावयाची होती असं ते आज छातीठोकपणे सांगत आहेत ते एका दृष्टीने त्यांचे खरंच आहे .

2014 साली तुमच्या मनातही नसताना आणि स्वप्नातही नसताना पक्षांन तुम्हाला मुख्यमंत्रीपदावर बसवलं त्यानंतर तुम्हाला त्या पदाचा मोह आवरला नाही आणि म्हणून 2019 साली जेव्हा उद्धव ठाकरे सोबत येत नाहीत असं लक्षात आलं तेव्हा तुम्ही पवारांशी हात मिळवणी केली .भाजपचे एक प्रचंड अभ्यासू हुशार स्वच्छ चारित्र्याचे म्हणून तुमच्याकडे महाराष्ट्र पाहतो परंतु तुम्ही मात्र आपली ही प्रतिमा राष्ट्रवादीसोबत जाऊन धुळीला मिळवली. राजकारणामध्ये काहीही अशक्य नाही हे जरी खरं असलं तरी ज्यांनी 40-50 वर्षात महाराष्ट्र लुटून खाल्ला, नात्यागोत्याच्या पलीकडे राजकारण केलंच नाही, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसताना तुम्हाला थोडी तरी जनाची नाही तर मनाची वाटायला पाहिजे होती.

तुम्ही मात्र सत्ता सुंदरीच्या माग एवढे बेभान झाला होतात की सगळं काही सोडून तुम्ही थेट राष्ट्रवादी काँग्रेस सोबत घरोबा केला त्यावेळी काय ठरलं होतं काय नाही हे तुम्हाला आणि पवारांनाच माहिती परंतु तुम्हाला गुगली टाकून तुमची विकेट काढण्यात पवार यशस्वी झाले आणि तेथून तुमच्या राज्यातील राजकारणाचा ऱ्हास सुरू झाला. हे मात्र अद्यापही तुमच्या लक्षात आलेले दिसत नाही. शरद पवारांच्या पन्नास वर्षाच्या राजकारणात ज्यांनी ज्यांनी त्यांना विरोध केला एक तर ते पवारांचे मांडलिक झाले किंवा पवारांनी त्यांना राजकारणातून दूर केलं तुम्ही मात्र आपले पाय घट्ट होऊन ठामपणे शरद पवारांसमोर उभे राहिलात अगदी त्यांनी तुमची जात काढली धर्म काढला तरी देखील तुम्ही पवारांसमोर आव्हान उभा केल आणि त्यामुळेच फडणवीस सारख्या कसलेल्या राजकारणाला नामोहरम करण्याची संधी पवारांना मिळाली तर ती त्यांनी न घेतल्यासच आश्चर्य

तब्बल तीन साडेतीन वर्षांपूर्वी जे काही रामायण महाभारत घडलं त्यावर आता तुम्ही काहीही खुलासा केले तरी त्याला काही अर्थ नाही गाडीने खाल्लं काय आणि चमच्याने खाल्लं काय फरक काय पडणार त्यावेळी जी चूक झाली आणि त्यातून तुमचा जो गेम झाला तो सगळ्यांनाच माहित आहे आज तुम्ही काकांनी पुतण्याचा गेम केला असं जरी म्हणत असले तरी ज्या पुतण्यावर सिंचन घोटाळ्यात 70000 कोटी रुपये भ्रष्टाचार केल्याचा आरोप झाला त्याच पुतण्याला सोबत घेऊन तुम्ही मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली खरोखर लाज वाटते हो तुम्ही खूप प्रामाणिक आहात यावर आता विश्वास बसत नाहीये राजकारणात कराव्या लागणाऱ्या सगळ्या ऍडजेस्टमेंट तुम्ही सुद्धा करता वेळप्रसंगी आपल्या स्वपक्षीयांचा काटा काढायलाही (पंकजा मुंडे,विनोद तावडे,प्रकाश मेहता,चंद्रशेखर बावनकुळे लिस्ट मोठी आहे)  तुम्ही मागेपुढे पाहत नाहीत आणि त्यामुळेच जेवढ्या लवकर तुमच्या राजकारणाचा वेलू गगनावरी गेला त्यापेक्षा अधिक वेगाने तो खाली येईल की काय अशी भीती अशी भीती आता वाटू लागली आहे

शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणात प्रत्येकच पक्षात आदर असलेलं एक व्यक्तिमत्व आहे त्यांचा राजकारणाचा ग्रामीण भागाचा अभ्यास देखील मोठा आहे परंतु राजकारणातून त्यांनी जे काही गोळा केला आहे त्यात कुठेतरी भ्रष्टाचाराचा वास येतोच येतो आणि तुमच्या सारख्या कसलेल्या राजकारणाला त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून सत्ता स्थापन करावी वाटण म्हणजेच तुम्ही देखील त्यांच्या पंगतीत जाऊन बसलात आणि हेच तुमचं चुकलं

नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी 2019 च्या निवडणुका अगोदर शिवसेनेला सोबत न घेता सरकार स्थापन करण्यासाठी तुम्हाला फ्रीहँड दिला होता पण तुम्ही मात्र शिवसेनेचे लोडण गळ्यात अडकवून फिरण्यात धन्यता मानली आणि सत्तेपेक्षाही पैशासाठी हापापलेल्या सेना नेतृत्वाने योग्य वेळी तुमच्या पाठीत खंजीर खुपसत गेम केला तुमच्या विरोधात जे जे म्हणून एकत्र येतील त्यांना सोबत घेत काकांनी देखील तुम्हाला मी पुन्हा येईल यापासून रोखण्याची पूर्ण फिल्डिंग लावली तुम्ही मात्र आपण किती हुशार आहोत राजकारणात कसे ऍडजेस्टमेंट करू शकतो या भ्रमात राहिलात

वर्षभरापूर्वी देखील उद्धव ठाकरे यांच सरकार खाली खेचण्यात तुम्हाला यश आलं मात्र गेल्या तीन वर्षातील तुमची राजकीय हातबलता पाहता याच क्रेडिट तुम्हाला द्यावं की नाही असं वाटू लागले कारण हा सगळा डाव तुम्ही आखला असता तर केंद्रीय नेतृत्वाने तुम्हालाच मुख्यमंत्रीपदी बसवलं असतं मात्र ज्या पद्धतीने मनात नसताना तुम्हाला उपमुख्यमंत्री पद स्वीकारणं भाग पडलं ते पाहता हा सगळा डाव केंद्र रचला होता आणि
शेवटपर्यंत तुम्हालाही याची कल्पना नव्हती असंच वाटतं

याचा सरळ सरळ अर्थ अवघ्या पाच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात तुमच्या डोक्यात हवा शिरली आणि तुम्ही तुमची राजकीय कारकीर्द एका निसरड्या उतारावरून पणाला लावली अजूनही वेळ गेलेली नाही भाजपचं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसीकरण करण्यापेक्षा निष्ठावंतांना सोबत घेऊन त्यांची चार काम मार्गी लावून थेट जनतेच्या दारापर्यंत जाऊन 2024 चा सामना लढायला तयार व्हा नाहीतर पुन्हा त्यावेळी माझी चूकच झाली असं म्हणायला काळही संधी देणार नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *