बबन शिंदेच्या बोगस शाळेवर अनुदानाची खैरात!
बीड – बीड जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचा कारभार कसा अंदा धुंद आहे याचे एक अनोखे उदाहरण समोर आले आहे. दोन वर्षापासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या जिजाऊ पतसंस्थेचे मालक बबन शिंदे यांच्या मूकबधिर शाळेचा यु-डायस नंबर आणि इतर कागदपत्रे तसेच विद्यार्थी संख्या पुरेशी नसताना देखील समाज कल्याण अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर अनुदानाची खैरात केली आहे हा प्रकार म्हणजे आंधळं दळतय आणि कुत्र पीठ खातय असाच म्हणावा लागेल. ही शाळा कायमस्वरूपी बंद करून या शाळेतील विद्यार्थ्यांचे इतरत्र स्थलांतर करून समाज कल्याण अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी शिफारस समाज कल्याणचे संभाजीनगर विभागाचे उपायुक्त यांनी केली आहे.
तब्बल दोन ते अडीच वर्षांपूर्वी बीड सह पाच ठिकाणी शाखा असलेल्या जिजाऊ मासाहेब पतसंस्थेचे प्रमुख बबन शिंदे यांनी पतसंस्थेचा पैसा प्लॉटिंग व इतर व्यवसायात वापरल्याने फरार होण्याची वेळ त्यांच्यावर आली.
त्यांनी पतसंस्थेच्या पैशाच्या जोरावर कोट्यावधी रुपयांची इन्व्हेस्टमेंट इतर क्षेत्रात केली त्या माध्यमातून त्यांनी शाळा कॉलेज देखील उभारले मात्र पतसंस्थेला टाळे लागल्यानंतर बबन शिंदे हे फरार होते. त्या काळात त्यांच्या जेवढ्या काही मालमत्ता आहेत त्या आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयाच्या आदेशावरून जप्त केल्या.
बबन शिंदे हे फरार आहेत आणि त्यांची पतसंस्था वादाच्या भोवऱ्यात आहे हे माहीत असताना देखील त्यांच्या वासनवाडी फाटा येथील मूकबधिर शाळेवर जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांनी व त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी अनुदानाची खैरात उधळली आहे बबन शिंदे फरार आहेत आणि त्यांच्या शाळेमध्ये पुरेशी विद्यार्थी संख्या नाही हे माहीत असताना देखील समाज कल्याण अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून या संस्थेला अनुदान देणे सुरूच ठेवले.
विशेष बाब म्हणजे मूकबधिर शाळेचे युनिट सुरू ठेवायचे असल्यास किमान विद्यार्थी संख्या ही 40 च्या आसपास लागते मात्र वासनवाडी येथील मूकबधिर शाळेत केवळ सात विद्यार्थी असल्याचे उपायुक्त यांनी केलेल्या तपासणीत उघड झाले. त्यानंतर या शाळेला यु-डायस नंबर असेल अथवा इतर परवानगी असतील त्या देखील नाहीत लायसन रिन्यू केलेले नाही अशा अनेक त्रुटी आढळून आल्या. विशेष बाब म्हणजे बीडच्या जिल्हा परिषद समाज कल्याण कार्यालयाने या सर्व बाबी कडे दुर्लक्ष करत संस्थेचे हित जोपासण्याचा प्रयत्न केला असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
समाज कल्याण विभागाचे छत्रपती संभाजी नगरचे उपायुक्त दीपक खरात यांनी समाज कल्याण आयुक्तांकडे पाठवलेल्या अहवालात ही शाळा कायमस्वरूपी बंद करून या शाळेत असलेल्या सात विद्यार्थ्यांना इतर शाळेमध्ये स्थलांतरित करावे तसेच एवढा सगळा सावळा गोंधळ असताना देखील त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या समाज कल्याण अधिकारी आणि त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी शिफारस करण्यात आली आहे.












Leave a Reply