News & View

ताज्या घडामोडी

साखर उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर !

मुंबई- साखर उत्पादनात देशात महाराष्ट्र यावर्षी एक नंबर वर राहिलेला आहे.महाराष्ट्रातील गाळप हंगाम संपून जवळपास वीस दिवस उलटून गेले आहेत.देशात सर्वाधिक साखर उतारा गुजरात मध्ये मिळाला आहे.अद्यापही उत्तर प्रदेश मधील कारखाने सुरू आहेत हे विशेष.

साखर उत्पादनात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात व तमिळनाडू या पाच राज्यांनी आघाडी घेतली आहे. या खालोखाल हरियाना, पंजाब आणि बिहारचा क्रमांक आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे १०५.३० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.

महाराष्‍ट्रातला हंगाम पूर्णपणे संपला आहे. उत्‍तर प्रदेशात अजूनही ३८ साखर कारखाने सुरू आहेत. सध्‍या उत्‍तर प्रदेशात १०१ लाख टन साखर उत्पादित झाली आहे.

हंगाम संपेपर्यंत उत्‍तर प्रदेशचे उत्पादन महाराष्ट्राइतका होण्‍याचा अंदाज आहे. देशातील ५३१ साखर कारखान्यांपैकी ६७ कारखान्यात अजूनही ऊस गाळप सुरू आहे.

कर्नाटकात ५५.५०, तमिळनाडू व गुजरातमध्ये अनुक्रमे १०.९५ व १०.१० लाख टन साखरेची निर्मिती झाली आहे. याशिवाय हरियानात ७.१५, पंजाबमध्ये ६.६५, बिहारमध्‍ये ६.४० लाख टन उत्पादन झाले आहे.

या राज्यांशिवाय मध्य प्रदेशात ५, उत्तराखंडमध्ये ४.७५, तेलंगणात २.८०, आंध्र प्रदेशात २.३० व उर्वरित राज्यात १.५० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.

देशात सर्वाधिक सरासरी साखर उतारा गुजरातमध्ये १०.८० टक्के आहे. त्या खालोखाल कर्नाटका १०.१०, तेलंगणा १०.१०, महाराष्ट्र १०, आंध्र प्रदेश ९.७०, बिहार ९.७० व उत्तर प्रदेश ९.६५ टक्के या राज्यांचा क्रमाक आहे.

एप्रिल अखेर देशात उसाचे सर्वाधिक गाळप उत्तर प्रदेशात १०५५.९६ लाख टन इतके झाले आहे. त्या खालोखाल महाराष्ट्रात १०५३ लाख टन गाळप झाले आहे. व कर्नाटकाचा ५४९.५० लाख टन गाळप झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *