बीड -छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत भरती केलेल्या शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वैयक्तिक मान्यतेमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे विभागीय उपसंचालक यांच्या कार्यालयांतर्गत एक सदसीय समितीचे गठण करण्यात आले आहे. सर्व संस्थाचालक आणि मुख्याध्यापक यांनी या समितीसमोर सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश शिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील यांनी काढले आहेत. त्यामुळे बोगस शालार्थ आयडी च्या माध्यमातून आपले उखळ पांढरे करणाऱ्या संस्थाचालकांची पाळेमुळे खणून काढली जाणार आहेत.

बीडच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील यांनी मागील महिन्यात एक पत्र काढले आहे. यानुसार शिक्षण उपसंचालक यांनी गठीत केलेल्या एक सदसीय समितीला शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतेच्या प्रस्तावामध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत.
त्यामुळे या त्रुटीची आणि कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी पुन्हा नव्याने एक सदसीय समितीचे गठन करण्यात आले आहे. या समितीसमोर सर्व संस्थाचालक आणि मुख्याध्यापक यांनी पडताळणी साठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नागपूर येथे उघडकीस आलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यात अनेक अधिकारी आणि संस्थाचालक अटक झाले. त्यानंतर शासनाने राज्य स्तरावर एस आय टी ची स्थापना केली. या मार्फत राज्यातील सर्व खाजगी संस्थामधील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या भरती बाबत माहिती सादर करण्याचे आदेश देण्यात आले.
बीड जिल्ह्यात भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेसह शेकडो संस्थामध्ये बोगस भरती झालेली आहे. याची चौकशी देखील सुरु झाली आहे. मात्र या बोगस भरतीसाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले आहेत त्यांनी आता एस आय टी मॅनेज करण्यासाठी धडपड सुरु केली आहे.
काही संस्थामधील कार्यवाह किंवा सहकार्यवाह अथवा शिक्षण सभापती यांनी या भरतीमध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केलेला आहे. एस आय टी चौकशीत आपले पितळ उघडे पडू नये म्हणून मॅनेजमेंट करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
मात्र या सर्व प्रकरणात यश येईल अशी शक्यता कमी आहे. अशातच आता शिक्षणाधिकारी यांनी नव्याने चौकशी साठी पत्र काढल्याने या बोगस भरती करणाऱ्यांची चांगलीच तंतरली आहे. या चौकशीत आपली आणि इतर संस्थाची पाळे मुळे खोदून निघणार हे समोर दिसत असल्याने हे दलाल हैराण झाले आहेत.





Leave a Reply