बीड – शहरातील नगर रोड परिसरात असलेल्या सरकारी कार्यालयाना मोठ्या प्रमाणात अतिक्रमनाचा वेढा पडला आहे. जिल्हा प्रशिक्षण केंद्र असो कि रुग्णालयाचे स्टाफ क्वार्टर अथवा जिल्हा परिषद कन्या शाळेचा परिसर असो या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहेत. विशेष म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांना जाता येता याचा त्रास होतं असला तरी ते मूग गिळून गप्प आहेत. कदाचित या अतिक्रमण धारकांकडून या अधिकाऱ्यांना मलिदा मिळतं असावा म्हणून कार्यालयाच्या दारात असलेले अतिक्रमण त्यांना दिसत नसावे.
बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेली जिल्हा परिषद ची इमारत असो कि एसपी ऑफिस समोरील जागा, अथवा आरोग्य विभागाचे जिल्हा प्रशिक्षण केंद्र किंवा जिल्हा रुग्णालयाचे स्टाफ क्वार्टर या सर्व ठिकाणी गॅरेज, पान टपरी, आटोमोबाईल, चहाचे गाडे यांनी अतिक्रमण केले आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अखत्यारीत असलेल्या जिल्हा प्रशिक्षण केंद्रासमोर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. या केंद्राच्या परिसरात दिवसभर आपे रिक्षा लावलेले असतात. सरकारी कार्यालयाची जागा म्हणजे आपल्या हक्काची पार्किंग असल्याप्रमाणे या ठिकाणी रिक्षा उभे असतात.

ट्रेनींग सेंटर समोर फळ विक्री केंद्र उभारण्यात आले आहे. एक दोन दिवसासाठी उभारण्यात आलेले हे शेड आता कायम स्वरूपी झाले आहे. तसेच त्याच्याच बाजूला शिव भोजन केंद्र आणि खानावळ आणि बाजूला पानाची टपरी देखील उभारली आहे.

एसपी ऑफिस ते ट्रेनिंग सेंटर या दरम्यान सरकारी कार्यालयाच्या कंपाऊंड वॉल ला खेटून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले असताना जिल्हा परिषद कन्या शाळा आणि आरोग्य विभागाच्या परिसरात आतल्या बाजूने चक्क पत्र्याचे घर उभारले गेले आहे. विशेष म्हणजे या पत्र्याच्या घराला जिल्हा परिषद माध्यमिक विभागातून वीज पुरवठा करण्यात आला आहे.

सरकारी कार्यालयाना अतिक्रमनाचा वेढा पडलेला असताना सरकारी अधिकाऱ्यांनी मात्र डोळ्यावर पैशाची पट्टी बांधल्या प्रमाणे वागत असल्याचे चित्र आहे. स्वतःला कर्तव्यदक्ष म्हणवून घेणारे जिल्हाधिकारी असोत किंवा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी असोत रोज या रस्त्यावरून ये जा करतात मात्र ते देखील याकडे कानाडोळा करत असल्याचे चित्र आहे.
सरकारी कार्यालयासमोरील जागा आपल्या बापाची असल्याप्रमाणे त्याचा अतिक्रमण धारक वापर करत आहेत. त्यांना अडवण्याची कोणाचीच हिंमत नसल्याचे चित्र आहे. हे अतिक्रमण धारक या सरकारी बाबुना चिरीमिरी देत असल्याची चर्चा आहे, त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कोणीच पुढाकार घेत नाही. भविष्यात या अतिक्रमणामुळे मोठा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण असणार हा देखील प्रश्न उपस्थित होतं आहे.












Leave a Reply