गेवराई – अपघातग्रस्त वाहनातुन उतरत असताना सहा मित्रांना आयशर टेम्पोने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात सहाही मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गेवराई नजिक घडली. मृत सहा तरुण गेवराई शहरातील रहिवाशी आहेत.
गेवराई येथील छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ झालेला हा अपघात इतका भयंकर होता की रस्त्यावर मृतदेहांचा खच पडला… जिकडे तिकडे रक्त होतं. या अपघातानंतर गेवराईमध्ये एकच खळबळ उडाली.
बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी पुलावर भीषण अपघात झाला. बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दीपक सरोया, भागवत परळकर आणि सचिन ननवरे यांचा मृत्यू झाला आहे. सहा जणांच्या अपघाती निधनाने गेवराईवर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गेवराई येथील काही तरुणांची चारचाकी गाडी डिव्हायडरला धडकून गढी परिसरात बंद पडली होती. या गाडीतुन बाहेर पडणाऱ्या सहा जणांना भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. या धडकेत गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला आणि सर्व सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, घटनास्थळावर जिकडे तिकडे रक्त होतं.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन पथकाने तातडीने घटनास्थळ गाठले. मृतदेहांना पोस्टमार्टमसाठी स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, अपघाताला कारणीभूत ठरलेला कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. या अपघाताने गेवराई परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Leave a Reply