News & View

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांना 2400 कोटी अनुदान वाटपास सुरवात!

मुंबई – राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या शब्दांनुसार मागील वर्षी भाव पडल्याने नुकसान झालेल्या राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे अर्थसहाय्य करण्याच्या योजनेतुन आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण प्रणालीची कळ दाबून प्रत्यक्ष शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वितरणाची सुरुवात करण्यात आली. याद्वारे एका क्लिकवर सुमारे 49 लाख 50 हजार हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टर च्या मर्यादेत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर 2398 कोटी 93 लक्ष रुपये रक्कम वर्ग करण्यात आली.

2023 च्या खरीप हंगामात एकूण 96 लाख 787 खातेदार शेतकरी हे सोयाबीन व कापूस उत्पादक होते. त्यानुसार त्यांना मदत करण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाने एकूण 4194 कोटी रुपये इतका निधी डीबीटी प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला आहे. त्यापैकी 1548 कोटी 34 लक्ष रुपये कापूस तर सोयाबीन साठी 2646 कोटी 34 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

अनुदान स्वतंत्ररीत्या वितरण करण्यासाठी लेखाशीर्षासह महाआयटी द्वारे स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आले होते. त्यावर शेतकऱ्यांची स्वतःचे संमती पत्र व बँक खाते आधार इत्यादी माहिती जमा करून ती माहिती जुळणे आवश्यक असल्याने यामध्ये काही कालावधी लागला.

आज जवळपास 49 लाख 50 हजार शेतकऱ्यांना आपण याद्वारे लाभ दिला आहे. आधार व अन्य माहितीची जसजशी जुळणी होत राहील तसं तसे उर्वरित शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ दिला जाईल अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *