नारायणगड -आरक्षण भेटलं आहे, आता मागे हटू नका, मी किती दिवसाचा पाहुणा आहे माहित नाही, पण समाजासाठी मी सतत लढलो अन जिंकलो असं म्हणत मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्यात भावनिक भाषण केले.
नारायणगड येथे आयोजित करण्यात आलेल्या दसरा मेळाव्यात जरांगे पाटील यांच्यासह मठाधीपती शिवाजी महाराज यांची उपस्थिती होती.
“मला बोलण्यास त्रास होत आहे. मला जशी मला ताकद मिळाली, तशी शेतकऱ्यांना मिळावी. पाच ते सहा महिन्यांपूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली की, ‘मी थोड्या दिवसांची पाहुणा आहे.’ आपण मुंबईला हाक दिली. कारण, मी बोललो की, शेवटी शरीर आहे. मला गरिबांच्या लेकरांचं आयुष्य करू द्या. मुंबईला चला. मी आहे तोपर्यंत माझ्या समाजातील लेकरांना आरक्षण दिलेले मला पाहायचं आहे. कुणी मागे हटू नकू… सरकू नका.. तुम्ही आता साथ दिली, तर लेकरांचं कल्याण करू शकलो. तुम्ही साथ आणि जीआर जिंकून आलो.”
मी कधीही नाटक केले नाही
“मी आता थोड्या दिवसांचा पाहुणा असो किंवा खूप दिवसांचा मला आता त्याची चिंता नाही. जीवनात येऊन सिद्ध करायचे होते, ते मी केले आहे. गरीब मराठा समाज खूप होरपळत होता. तो होताना मला बघवत नव्हते. मी कधीही नाटक केले नाही. समाजाला खोटे बोललो नाही. एखाद्या वेळेस एक दोन पावले पुढे झाले असेल. एखादी चूक झाली असेल, पण मला समाज तरफडताना दिसत होता. लेकी बाळी पोरं बाळे मोठे करायचे असेल, तर शेतीबरोबर आरक्षणाचा आधार देणे गरजेचं आहे. त्यासाठी रात्रंदिवस तुटून पडलो. नोकरी आणि शिक्षणापासून कुणीही लांब राहू नये, हा समाजाचा हट्ट होता. सहा कोटी मराठ्यांचे लेकरे सुखी समाधानी राहण्यासाठी आयुष्य झिजवले,” असे जरांगे-पाटील यांनी सांगितले.
तुमच्याशी गद्दारी करून मी मोठा झालो असतो
“खूप जणांनी सातारा संस्थान ( पश्चिम महाराष्ट्र ) आणि हैदराबाद गॅझेट ( मराठवाडा ) येथील मराठा आरक्षणात गेला तर राज्याला नाहीतर देशाला वेढा टाकेल म्हणून आरक्षण मिळून देत नव्हते. दुसरे विरोधात गेले पण आपल्यांनी फितूर व्हायला नको होते. जीव धरणीला टेकला तरी मागे हटलो नाही, हे फितुरांनी समजून घ्यायला पाहिजे होते. लढणारा मी, समाज आहे. तुम्हाला विकून, तुमच्याशी गद्दारी करून मी मोठा झालो असतो, तर फितुरी करायला पाहिजे होती. तुमचे रक्त आमचे असून सुद्धा इतके भेसळ रक्तासारखे कसे वागलात? हे मराठ्यांना कळले नाही. आमच्यासोबत नाही तर मिळाले त्यात सुद्धा समाधान व्यक्त करत नाहीत. तुम्हाला आयुष्यात काही देता आले नाही. ४५ वर्षांच्या लढाईत काहीच करता आले नाही. पांढरे कपडे घालून मोठ्या गाड्यांमध्ये फिरले. फक्त टीव्हीसमोर बोलले आणि पुस्तके वाचली. यातच यांनी मोठेपण आणि मर्दांगी गाजवली,” असे म्हणत मराठा समाजातील नेत्यांची खरडपट्टी जरांगे-पाटील यांनी काढली.
समाज बुडेल असे वागायला नको
“मी आणि गरीब मराठ्यांनी एका वर्षांत ५८ लाख लोकांना आरक्षण दिले आणि ३ कोटी मराठ्यांना आरक्षणात घालते. दोन वर्षांत मराठवाडा गॅझेटच्या माध्यमातून सगळा मराठा आरक्षणात घातला. जे मिळाले आहे, ते खूप मिळाले आहे. मी आणि माझा समाजाने डाव टाकून-टाकून सगळ्यांच्या मुंडक्यांवर पाय दिले आहे. थोडे हुशारीने चला.. खाताना विचार करा, गरम आहे की गार आहे.. समाज बुडेल असे वागायला नको,” असे आवाहन जरांगे-पाटील यांनी केले.












Leave a Reply