बीड -बोगस शिक्षक भरती घोटाळ्यात उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांपासून ते शिक्षण मंडळाच्या अध्यक्षाना अटक झाल्यानंतर आता संस्थाचालकांकडे एस आय टी ने मोर्चा वळवला आहे. ज्या ज्या संस्थेत बोगस भरती झाली त्यांची यादी तयार करण्यात आली आहे. या संस्थाचालकांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार असून ज्यांना ज्यांना नोकरी मिळाली ते शिक्षक आणि कर्मचारी देखील चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहेत.
अनेक संस्थाचालकांविरोधात विशेष तपास पथकाकडे(एसआयटी) तक्रारी आल्या असून त्यांचाही तपास केला जाणार आहे.या घोटाळ्यात १०५६ नियुक्त शिक्षकांची यादी जाहीर करण्यात आली. २०१९ ते २०२५ पर्यंत गैरमार्गाने ‘शालार्थ आयडी’ तयार करून शासनाचे कोट्यवधी रुपये लाटण्यात आले. शिक्षण संस्था चालक, शिक्षण उपसंचालक आणि वेतन अधीक्षकांच्या संगनमताने लाखो रुपयांचा आर्थिक व्यवहार करून हा सर्व घोटाळा झाला.
दरम्यान मराठवाड्यात देखील मोठ्या प्रमाणात बोगस शिक्षक भरती झाल्याच्या तक्रारी आहेत. बीडच्या शिंदे आणि फुलारी या शिक्षणाधिकारी यांची चौकशी उपसंचालक यांच्यामार्फत सुरु झाली आहे. त्याचसोबत संस्थाचालक यांची देखील लवकरच चौकशी होणार आहे. या घोटाळ्यात अडकलेल्या उपसंचालक यांच्यापासून ते संस्थाचालक यांच्यापर्यंत सगळ्यांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
संस्थाचालकांनीही यात आर्थिक गैरप्रकार केला. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अनेक शिक्षक आणि त्यांच्या नातेवाईकांनी संस्थाचालकांविरोधात ‘एसआयटी’कडे तक्रारी केल्या आहेत. त्यानुसार, आता संस्थाचालकांवर कारवाईचे संकेत मिळत आहेत.
शाळांमध्ये संस्थाचालकांचे नातेवाईक
अनेक शाळांमध्ये संस्थांचालकांचे नातेवाईक नोकरीला आहेत. तसेच, वरिष्ठ शिक्षकांना खालच्या पदावर ठेवून नातेवाईकांना पदोन्नती दिली गेली आहे. हा अधिकार संस्थाचालकांना असतो. याचा गैरफायदा घेण्यात आल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, काही शिक्षकांचा पैशांसाठी छळ सुरू असून त्यांचे वेतन रोखण्यात आल्याच्याही तक्रारी आहेत.
शालार्थ आयडी घोटाळ्याचा ‘एसआयटी’कडून कसून तपास सुरू असून अटकेत असलेले चिंतामण वंजारी, वैशाली जामदार, आणि लक्ष्मण मंघाम यांची कारगृहात रवानगी करण्यात आली.
Leave a Reply