अंबाजोगाई होणार पुस्तकाचे गाव!!
बीड- बीड जिल्ह्यात अधिक गुंतवणूक व्हावी यासाठी उद्योग विभागाने प्रयत्न करावेत तसेच मुख्यमंत्री रोजगार योजनेचे उद्दिष्ट पूर्ण होईल यासाठी काम करावे असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत केले. आज त्यांच्या उपस्थितीत 930 कोटी 11 लाख रुपयांचे करार झाले.यावेळी उद्योग तथा मराठी भाषा मंत्री सामंत यांनी अंबाजोगाई हे राज्यातील तिसरे पुस्तकाचे गाव म्हणून जाहिर केले.
उद्योग संचालनालय, जिल्हा उद्योग केंद्र तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मैत्री आणि जिल्हा प्रशासनाने संयुक्तरीत्या या परिषदेचे आयोजन केले होते. येथील ग्रॅड यशोदा हॉटेलमध्ये ही परिषद झाली.
जिल्ह्यातील 74 उद्योजकांनी केलेल्या या करारामुळे थेट तसेच अप्रत्यक्षरित्या 6036 जणांना रोजगार प्राप्त होणार आहे.
दिप प्रज्ज्वलनाने या परिषदेची सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर खा. सांदिपान भुमरे, जिल्हाधिकारी अविनाश पाठक, एमआयडीसीचे मुख्य अभियंता गावंडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक तसेच अनिल जगताप, राजेश देशमुख, उद्योग सहसंचालक बी. टी. यशवंते, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक किरण जाधव, व्यवस्थापक विजय काकड, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी डी.व्ही. फताटे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव इनकर व विश्वमाला इनकर यांनी केले.
आद्यकवी मुकुंदराज यांचे जन्मस्थान असलेल्या अंबाजोगाईला पुस्तकाचे गाव म्हणून जाहीर करण्यात येईल. अशी घोषणा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज येथे केली.
येत्या 2 महिन्यात याबाबतची कार्यवाही पूर्ण केली जाईल असे श्री सामंत म्हणाले. खोलेश्वर महाविद्यालय, योगेश्वरी महाविद्यालय, कवी मुकुंदराज समाधी स्थळ, शासकीय महाविद्यालय आणि अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय या पाच ठिकाणी या कवितांच्या गावातील दालन सुरू करण्यात येतील.
Leave a Reply